वयाच्या सतराव्या वर्षी 1967 साली पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतीमुळे नसिमा हुरजूक यांचे कंबरेपासून खालचे शरीर लुळे पडले. हा मोठा आघात धीराने पचवून त्यांनी शिक्षण सुरू ठेवले आणि 1973 मध्ये शिवाजी विद्यापीठाची अर्थशास्त्रातील पदवी मिळविली.
त्यानंतरची लढाई असते ती मनाची लढाई. “हे सारं आपल्याच वाट्याला का आलं?’ हा प्रश्न अस्वस्थ करीतच असतो. त्यामुळं नकारात्मक भावना वाढायला लागतात. जीव नको, जगणंच नको, असं वाटू लागतं. या अवस्थेतून बाहेर येण्यासाठीची लढाई लढावी लागते तीही त्या-त्या व्यक्तीला स्वतःलाच. यासाठी बाहेरून, अन्य कोणाकडून काही मदत मिळेल अशी शक्यता आपल्या समाजात आजच्या घडीलाही कमीच आहे. “मी उपयुक्त आहे’ ही भावना त्या व्यक्तीच्या मनात निर्माण व्हावी लागते. अशी भावना निर्माण झाली की ही लढाई जिंकली असं म्हणता येईल.
त्यापुढं तिसरी लढाई असते समाजात वावरताना करावी लागणारी. कुठं जायचं म्हटलं तर, अपंगांना काय सोयीचं होईल याचा विचार क्वचितच केलेला दिसतो. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सरकारी यंत्रणा साह्यभूत होताना क्वचितच दिसते. अपंगांबाबतही तिचं धोरण बदलत नाही. त्यामुळं ही लढाई प्रत्येकाला लढावीच लागते. रुग्णालयातून घरी पाठविताना अपंगांना चाकाच्या खुर्च्या दिल्या जाव्यात, ही साधी अपेक्षा आपल्याकडे कित्येक वर्षं पूर्ण केली जात नाहीये. मग, त्यांना स्वावलंबन शिकवून पाठवणं तर दूरच. प्रत्येक रुग्णालयाला जोडून अपंगांसाठी एक पुनर्वसन केंद्र असायला हवं. “आपण उपयुक्त आहोत’ ही भावना अपंगांमध्ये प्रभावीपणं निर्माण केली जायला हवी. उपचारांच्या पहिल्या टप्प्यातच हे उत्तमप्रकारे होऊ शकतं. पण, दुर्दैवानं आपल्याकडं ते अद्यापही होत नाही.
माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षी साधं पाठदुखीचं निमित्य झालं. डॉक्टरांना नीट निदान झालं नाही.
पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती आणि अचानक माझे दोन्ही पाय लुळे पडले. ज्या वयात आयुष्याचा अर्थ आकाराला येऊ लागतो त्याच वयात हा आघात झाला. मी आंतर्बाह्य उन्मळून पडले होते. त्यातच माझे वडील पैगंबरवासी झाले. कमालीचं नैराश्य आलं. मी बिछान्याला खिळून असे. भोवताली काळाकुट्ट अंधारच होता. अशा अवस्थेत बंगळूरच्या “असोसिएशन ऑफ फिजिकली हॅन्डिकॅप्ड” या संस्थेचे बाबूकाका दिवाण यांची भेट झाली आणि माझा दृष्टिकोनच बदलून गेला.
जीवनाचं ध्येय एकदा ठरलं की त्या दिशेनं वाटचाल आपोआप सुरू होते. त्या काळात मला कुशीवर वळणंही शक्य होत नसे. पण, मग आपण काय गमावलंय, आपल्याकडचं काय गेलंय यापेक्षा आपल्याकडे अजूनही काय शाबूत आहे याचा विचार मी करू लागले. मला लक्षात आलं की मी विचार करू शकते. माझे हात धडधाकट आहेत. त्यांचा वापर मी अनेक गोष्टींसाठी करू शकते. आणि मग मी काम सुरू केलं. हळूहळू माझं शिक्षण पूर्ण केलं. नोकरी धरली. अर्थात आज इथे लिहितांना जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं ते कधीच नव्हतं. अनेकवार मनात झगडा सुरू व्हायचा.
दरम्यानच्या काळात इतरांसाठीही काम करायला सुरवात झाली होती. आपले हात तरी धडधाकट आहेत. ज्यांचे हातही कमकुवत आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं, असं मी ठरवलं. अर्थात, आपल्या स्वतःच्या अडचणी विसरून इतरांसाठीच्या कामात गुंतणंही कठीणच होतं. हळूहळू सवयीनं ते ही अंगवळणी पडत गेलं. इतर अनेकांची साथ मिळाली आणि काम वाढतच गेलं. पण, हे झालं म्हणजे लढाई संपली असं होत नाही. ती चालूच राहते.
सध्या मी सिंधुदुर्गात स्वप्ननगरीमध्ये असते. मला पहाटे अगदी लवकर जाग येते. जाग आल्यावर, पहिल्याप्रथम रात्रभर अंगाखाली राहिल्यानं लघवीचा वास येत असलेल्या बेडशीटस् वॉशिंग मशिनमध्ये टाकून धुणं आणि अस्वस्थ करणारा वास घालवणं हेच माझं पहिलं काम असतं. स्वच्छ होऊन मग संगणकावर काम करायला सुरवात करायची. आदल्या दिवसभरात आलेल्या फाइल्स पाहणं, निर्णय घेणं, त्यानुसार शेरे देणं हे सारं पहाटेच्या त्या शांत वेळी भराभर होत जातं. तोपर्यंत वसतिगृहातल्या मुलांची उठण्याची वेळ होत आलेली असते. मग तिकडे फेरी होते. मला मदत करणाऱ्यांची झोपही तेव्हा पूर्ण झालेली असते.
अर्थात, असं जगणं प्रत्येकालाच शक्य होईल असं नाही. अनेकांना रात्री झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. पण, दिवसभरात नीट नियोजनपूर्वक श्रम केले तर रात्री शांत झोप येतेच, असं माझं म्हणणं असतं. आव्हानं भरपूर आहेत. पण, आशेचे किरणही दिसत असतात. म्हणूनच, एक सातत्याने करत राहायचं. आपली लढाई सतत लढत राहायचं. मनात लढाई, घरात लढाई, घराबाहेर लढाई, असं लढायचं प्रत्येक सेकंद!
- नसिमा हुरजूक
श्री. अयाझ संगरार,
हेल्पर्स ऑफ द हॅन्डीकॅप्ड, कोल्हापूर.
आत्माराम अपार्टमेन्टस्,
किरण बंगल्याजवळ, ताराबाई पार्क,
कोल्हापूर - 416003.
दूरध्वनी - 0231-2680026.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.